आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाची ‘आविष्कार’ स्पर्धेत अभिमानास्पद झेप
मुंबई विद्यापीठ आयोजित २०वे आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन ही नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना वाव देणारी स्पर्धा यावर्षी दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी कणकवली कॉलेज, कणकवली येथे संपन्न झाली. विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नवोन्मेषी कल्पना, समाजोपयोगी संशोधन प्रकल्प आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांनी भरलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संशोधन कौशल्याची कसोटी मानला जातो. या स्पर्धेत आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उज्ज्वल यश संपादित केले.
महाविद्यालयातून तब्बल दहा प्रकल्प आणि वीस विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या दहा प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांची निवड विद्यापीठ स्तरावर अंतिम फेरीसाठी झाली असून ही संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. पदवी स्तरावर श्री दीपराज दत्तात्रयराव राणे आणि श्री अमोल केशव कदम यांच्या प्रकल्पाची निवड झाली असून त्यांना डॉ. के. एस. पाखरे यांनी मार्गदर्शन केले. तर पदव्युत्तर स्तरावर कुमारी राखी रमेश सावंत आणि कुमारी तन्वी वासुदेव तुळसकर यांच्या प्रकल्पाची विद्यापीठ स्तरावर निवड झाली असून त्यांचे मार्गदर्शक डॉ. डी. एम. सिरसठ होते.
या अविष्कार विभागाचे समन्वयक म्हणून डॉ. डी. बी. शिरगावकर तर सदस्य तर सदस्य म्हणून डॉ. व्ही. ए. पैठण, प्रा. आर. बी. पाटील व डॉ. के. पी. पाटील यांनी काम पाहिले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले असून, आगामी विद्यापीठस्तरीय फेरीसाठी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.